गाथा अभंग २६१
चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तो चि आम्हीं कंठीं साठविला ॥१॥
काय एक उणें आमुचिये घरीं । वोळगती द्वारीं रिद्धिसिद्धी ॥ध्रु.॥
असुर जयानें घातले तोडरीं । तो आम्हांसि जोडी कर दोन्ही ॥२॥
रूप नाहीं रेखा जयासि आकार । आम्हीं तो साकार भक्तीं केला ॥३॥
अनंत ब्रम्हांडें जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आम्हासाठीं ॥४॥
रिद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥५॥
तुका म्हणे आम्ही देवाहूनि बळी । जालों हे निराळी ठेवुनि आशा ॥६॥
अर्थ :- चौदा भवनांचा जो जन्मदाता आहे, तो आमच्या कंठामध्ये नांदत आहे ।।1।।
त्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, प्रत्येक्ष रिद्धि-सिद्धि आमच्या घरी नांदत आहे ।।ध्रु।।
असुरांना बंदीवासात टाकणारा भगवंत आमच्यापुढे (भक्तापुढे) हात जोडून नामरतेने उभा आहे ।।2।।
जो रंगरूपावाचुन निर्गुण निराकार आहे, त्याला आम्ही सगुन साकार बनविले आहे ।।3।।
जो अनेक ब्रह्मांडाचा जन्मदाता आहे, तो आमच्या साथी सूक्ष्मरूप धारण करतो ।4।।
तुकोबा म्हणतात, आम्ही (भक्त) देवाहुं भाग्यशाली आहे; कारन आम्ही आशारहित भक्ति करत आहेत ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा