गाथा अभंग २४९
न देखोन कांहीं । म्या पाहिलें सकळ ही ॥१॥
जालों अवघियांपरी । मी हें माझें ठेलें दुरी ॥ध्रु.॥
न घेतां घेतलें । हातें पायें उसंतिलें ॥२॥
खादलें न खातां । रसना रस जाली घेतां ॥३॥
न बोलोनि बोलें । केलें प्रगट झांकिलें ॥४॥
नाइकिलें कानीं । तुका म्हणे आलें मनीं ॥५॥
अर्थ :- काही न पाहता मी विश्वातील सर्व पाहत आहे ।।1।।
कारण मी माझा देहभान, देहबुध्दी विसरलो आणि विश्वतत्त्वाशि एकरूप झालो आहे ।।ध्रु।।
म्हणून मी विश्वातील सर्व वास्तु पाहू शकलो व् पायांनी जेथे जावु शकलो तेथे मनाने जातो ।।2।।
काही न खाता सर्व भोजनांचा रसस्वाद घेतला आहे ।।3।।
कुनाशी न बोलता सर्वांशि बोललो आहे आणि जे गुप्त आत्मज्ञान होते ते उघड केले आहे ।।4।।
तुकोबा म्हणतात, कानांनी जे एकता नाही आले ते सर्व एकल आहे. ही आत्मस्वरूपाची ओळख आहे ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा