आंधळा
गाथा अभंग ४२७
आंधळ्यापांगळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तो चि सर्व होय जाणता ।
घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता । भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥
धर्म गा जागो तुझा तूं चि कृपाळू राजा । जाणसी जीवींचें गा न सांगतां सहजा ॥ध्रु.॥
घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटीं ।
न देखे दुसरें गा । जाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥२॥
आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवे जना चालते वाटे ।
घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे । पावला त्याकारणें धांव घातली नेटें ॥३॥
बैसोनि खोळी शुक राहे गर्भ आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा ।
मागील सोसिलें तें ना भीं म्हणे गोपाळा । पावला त्याकारणें । लाज राखिली कळा ॥४॥
न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो सांडवी धना ।
आपपर तें ही नाहीं बंधुवर्ग सज्जना । तुकया ते चि परी जाली पावें नारायणा ॥५॥
अर्थ :- आंधळ्या-पांगळ्यांना दाता एक विठोबाच आहे. तो विश्वाचा निर्माता असून सर्वज्ञ आहे. ज्याच्या त्याच्या पापपुण्याला अनुसरुण तो क्षणात भोगांच्या घडामोडी करतो. तुझ्यावाचुन संसारातील दुःख, चिंता कोण दूर करेल ? ।।1।।
भक्तांवर अनुग्रह करण्याचा तुझा धर्म जागृत राहो. तू कृपाळु राजा आहेस. काही न सांगता आमच्या अंत:करणातील सारे सहज जानतोस ।।ध्रु।।
चंद्रभागेच्या तिरावर पंढरी क्षेत्र आहे. तेथे पुंडलिकाने वालवंटात लोळण् घेतले व अनुष्ठान केले. जगाला पाहण्याची त्याची दृष्टी मावळली. त्याची अशी भक्ति पाहुन प्रेमदाता भगवंत तेथे आला व त्याने त्याच्यावर अमृताचा वर्षाव केला ।।2।।
उपमन्यु नावाच्या लहान बाळाने राजाच्या घरी दूध प्यायले होते. घरी आल्यानंतर त्याने आइकडे दूध मागितले. गरीबीमुळे दूध मिळतच नव्हते. आईने त्याला पाण्यांत पीठ कालवुन दिले; परंतु चव वेगळी होती. उपमन्युने दुधाचा हट्ट धरल्यावर आई त्याला म्हणाली, ''बाळा, देवाची कृपा असली तरच तसे दूध मिलते, नाहीतर नाही;'' ते एकूण उपमन्युने देवाचा ध्यासच घेतला. हरिनामाने देवाचा धावा केला. देव तेथे धावून आला ।।3।।
'जग पाहू नये' या बुद्धिने आंधळा होवून शुक आईच्या पोटात बारा वर्ष दडून बसला होता. जन्म-मरणाच्या एरझार्याच्या दुःखने तो येथे राहिला. देवाने 'भिउ नकोस' असे सांगून त्याचा देहाभिमान दूर केला आणि त्याची लाज राखलि ।।4।।
तुकोबाराय म्हणतात, जे सुखदुःखापासून व मोहापासून वेगळे होऊन द्रव्याची आठवनहि करत नाहीत, ईतरेजनांनकडे पाहत नाहीत आणि ज्यांना बंधुवर्ग, आपला परका असा भेदभाव नाही, अशांना देव दर्शन देतो. देवा, माझ्यावर कृपा कर ।।5।।