डाकेचे अभंग
गाथा अभंग ४१६
माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसावें ॥१॥
या रे लोटांगणीं । कांहीं करा विनवणी । करील झाडणी । भूत काढी संसार ॥ध्रु.॥
पडिले विषयांचे गोंधळीं । ते त्रिगुण आकळी । हरिनाम आरोळी । कानीं पडतां ते उठी ॥२॥
घेतला अहंकार । काम क्रोध या मत्सरें । पळती प्रेमभरें । अवघे ठाव सांडुनी ॥३॥
घेतलासे पुरा । माया ममता आसरा । अवघ्या एक सरा । पळती रंग देखोनी ॥४॥
तुका म्हणे द्यावा भाव । फिटेल मनिचा संदेह । आणीक न लगे ठाव । कांहीं कोठें हिंडावें ॥५॥
अर्थ :- माझा देव्हारा सत्य, सुंदर आहे. इतर कुणाचाच असा नाही. या देवाची कीर्ति त्रैलोकात पसरली आहे, म्हणून माझ्या देव्हार्यात कोणता देव आहे, हे कोणालाही विचारायला नको ।।1।।
तुम्ही या. लोटांगण घाला, विनंती करा म्हणजे तो झाडनी करुण भुत काढून टाकिल ।।ध्रु।।
जे विषयांच्या गोंधळात पडले आहेत, त्रिगुणांनी बांधले गेले आहेत, ते होरिनामाची अरोळी एकताच उठून बसतील ।।2।।
जे काम, क्रोध, मत्सर, अहंकार या भूतांनी झपातलेले आहेत, त्यांनी अंत:करणात जर हरिनामाचे प्रेम साठवून ठेवले तर ती भूते पळून जातील ।।3।।
माया, ममता यांचा ज्यांनी आसरा घेतला ते हरिनामाचा रंग पाहिल्यावर लगेच पळून जातील ।।4।।
तुकोबा म्हणतात, तुम्ही भाव अर्पण करा, म्हणजे मनातील संदेह फ़िटेल आणि तुम्हाला इतरत्र भटकाव लागणार नाही ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा