गौळणी
गाथा अभंग ३९०
हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हें वाळी जन मज ॥१॥
उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥
तुझिये अंगीं घुरट घाणी । बहु खासी दुध तुप लोणी । घरिचें बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥२॥
मज ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन । अंगीं तुझें देखोनि लक्षण । मग विटंबणा होइल रे ॥३॥
तुज लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलूं काहीं । मसी भीड नाहीं तुज माझी ॥४॥
वचन मोडी नेदी हात । कळलें न साहे ची मात । तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनि भोगी ॥५॥
अर्थ :- हे हरी,तुझी कांती सावळी आहे आणि मी चाफेकळीसारखि गोरी आहे. तुझ्या दर्शणाने मी ही काळी होईल आणि नंतर लोक मला वाळीत टाकतील ।।1।।
म्हणून तू काही चाळे न करता गप्प रहा. हे गोपाळा, तुला किती, कसे सांगू? अरे नंदाच्या बाळा, गोवळ्या (गुराख्या), तुझे कांबळे फारच खरखरित आहे ।।ध्रु।।
तुझ्या आंगाला धुरकट, उग्र वास येतो; कारण तू लोकांच्या घरातले दूध,तूप चोरून बाहर आणून खातोस. मी चांदणी सारखी नाजुक आहे गं! ।।2।।
लोक मला नाव ठेवतील. माझा धिक्कार करतील. कृष्ण, तुझ्या आंगावरील लक्षणे जर माझ्या आंगी दिसू लागली तर लोक माझी टर उडवतील ।।3।।
देवा, तुला लाज-लज्या, भय-शंका नाही. मला आप्त, सारे सोयरे, व्याही, जावई, हितचिंतक, शत्रु सारे आहेत. माझी तुला भीड़ कशी वाटत नाही रे! ।।4।।
तुकाराम महाराज म्हणतात, श्रीकृष्ण गोपीचि विनावनि एकत नव्हता. त्यांचा हात सोडत नव्हता. काहीही बोललेले त्यांना सहन होत नाही, हे ठाऊक असूनही बोलत होता. त्यांना 'जीवनमुक्त' स्तिथी देऊन भोग देत होता ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा