गाथा अभंग ३५४
देव आड जाला । तो भोगिता मी उगला । अवघा निवारला । शीण शुभाअशुभाचा ॥१॥
जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया कौतुकें । कैचीं येथें लोकें । हा आभास अनित्य ॥ध्रु.॥
विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वांटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ तयाचा ॥२॥
अवघी एकाची च वीण । तेथें कैचें भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ॥३॥
प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा ॥४॥
अर्थ :- मी परमार्थ मार्ग अनुसारला म्हणून माझ्या प्रापंचिक सूखदुःखाच्या आड़ प्रतक्ष परमेश्वर आणि तोच सर्व भोग भोगू लागला ; त्यामुळे मी त्या त्रासापासुन मुक्त झालो ।।1।।
त्या या मानवाला भतुकलीचा हां जीवाशिवाचा खेळ मंडुन दिला आहे; तेथे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ हे लोक फक्त आभास आहेत ।।ध्रु।।
हे जग खरे विष्णुमय आहे, येथे सर्व समान आहे, वर्णाश्रमाची निर्मिति हा त्याचा निमित्तमात्र एक खेळ आहे ।।2।।
त्या नारायनाने या सर्वांची निर्मिती केली असल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, असा वेदपुरुष नारायनाचा नेम आहे ।।3।।
तुकाराम महाराज म्हणतात, अशा या भगवंताच्या पायातळी मला जागा मिळाली आहे, मला त्या प्रसादाचा आनंद मिळतो आहे, मी आता भगवंताच्या पायापाशीच कायमचे वास्तव्य करणार आहे. तेथून मी कधीही दूर जाणार नाही ।।4।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा