गौळणी
गाथा अभंग ३९१
सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गार्हा।णें देती कैसें ।
काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळें ची कैसें।
दहिं दुध लोणी शिंकां नुरे चि कांहीं कवाड जैशाचें तैसें ।
चाळवूनि नाशिली कन्याकुमरें आमुच्या सुनांसि लाविलें पिसें गे बाइये ॥१॥
आझुनि तरी यासि सांगें बरव्या परी नाहीं तरी नाहीं उरी जीवेसाटी ।
मिळोनि सकळै जणी करूं वाखा सखीं तुज मज होईल तुटी गे बाइये ॥ध्रु.॥
नेणे आपपर लौकिक वेव्हार भलते ठायीं भलतें करी ।
पाळतुनि घरीं आम्ही नसतां तेथें आपण संचार करी ।
सोगया चुंबन देतो आलिंगन लोळे मेजाबाजावरी ।
शिंकीं कडा फोडी गोरसाचे डेरे धरितां न सांपडे करीं गे बाइये ॥२॥
आतां याची चाड नाहीं आम्हां भीड सांपतां कोड पुरवूं मनिचें ।
सोसिलें बहु दिस नव्हता केला निस म्हणुनि एकुलतें तुमचें ।
चरण खांबीं जीवें बांधैन सरिसा जवें न चले कांहीं याचें ।
अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा भलतें हो या जिवाचें गे बाइये ॥३॥
घेउनी जननी हातीं चक्रपाणी देतिसे गौळणी वेळोवेळां ।
निष्ठ वाद झणीं बोलाल सकळा क्षोभ जाइल माझ्या बाळा ।
जेथें लागे हात वाढतें नवनीत अमृताच्या कल्लोळा ।
देखोनि तुकयास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे बाइये ॥४॥
अर्थ :- पाच-सात गौळणी एकत्र आल्या व कृष्णच्या खोडयांचे गर्हाने यशोदेला सांगू लागल्या . लोकविलक्षण, चोरट्या, शिराजोर अश्या मुलाला तू जन्म का दिलास ? आमचे दूध-दही, लोनी हा शिंक्यावर राहु देत नाहीस. दार मात्र जसेच्या तसे (लोटलेले) असते. आमच्या कुलामुलिना त्याने नादाला लाउन बिघडविले आहे. आमच्या सुनांना रासक्रीडचे वेड लावले आहे ।।1।।
अगं यशोदा, अजुन तरी तू तुझ्या मुलाला चांगले काहीतरी शिकव; नाहीतर आम्ही जीवाची परवा करणार नहीं. मग मात्र आमच्या व तुझ्या संबंधात कटुता निर्माण होईल ।।ध्रु।।
तुझ्या मुलाला आपले-परके हां सामान्य व्यवहार काळत नाही. भलत्या ठिकाणी भलतेच् काहीतरी करतो. आम्ही घरात नसल्याचे पाहुन घरात घुसतो. आमच्या लेकिबाळीचे चुंबन घेतो. त्यांना मिठीत घेऊन बाजेवरच्या शय्येवती लोळावतो. शिंक्यावर असलेले दह्या-दुधाचे डेरे फोडतो. यशोदे, धरायला गेलो तर तो सापडत नाही ।।2।।
आम्ही आता याची फिड-भाड़ ठेवनार नाही. आता जर तो आमच्या हाती सापडला तर आम्ही आमच्या मनाप्रमाने त्याचे वाटेल ते करू. खुप दिवस आम्ही त्याचा पुष्कळ छळ सोसल; कारण आम्ही कठोर बनलो नव्हतो परंतु आता मात्र- ते एकुलते एक पोर असेल तरी ते जर आम्हाला सापडले तर त्याचे पाय जीवरूपी खांबाला बांधून ठेवू म्हणजे त्याचे काही चालणार नाही. मग त्याने जरी आम्हाला सारे ऐश्वर्य दिल, अगदी स्वताच्या प्राण दिला, तरी आम्ही त्याला सोडणार नाही. मग आमच्या जीवाचे काहीही झाले तरी चालेल ।।3।।
तुकाराम महाराज म्हणतात, यशोदेने चक्रपाणि गोपिंच्या हाती दिले. तुम्ही सर्वजनी प्रत्येक वेळी कटु शब्दांत माझ्या बाळाला काही बोलाल तर त्याच्या मनात भोग निर्माण होईल ते तुमच्यासाठी घातक असेल. जेथे त्याचा हात लागतो, तेथे दह्या-दुधाची समृद्धि येते. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वामिला पाहुन त्या गौळणी स्थल, देश काल, देह-सारे सारे विसरून गेल्या ।।4।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा