॥ स्वामीस सद्गुरूची कृपा जाली ॥ - अभंग ४
३७१
माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार जालों आतां ॥१॥
तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ध्रु.॥
ठायींचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संतीं ॥२॥
जीवभाव तुझ्या ठेवियेला पायीं । हें चि आतां नाही लाज तुम्हां ॥३॥
तुका म्हणे संतीं घातला हावाला । न सोडीं विठ्ठला पाय आतां ॥४॥
अर्थ :- देवा, माझ्या मनाचा निर्धार झाला आहे. मी जीवावर उदार झालो आहे, हे जाणून घे ।।1।।
भगवंता, तुझ्याशिवाय दूसरे कुणाचे पाय मी धरणार नाही आणि तुझ्या प्राप्तिच्या येणाऱ्या भय , शंका, लज्जा अश्या विकारांचा मी त्याग केला आहे ।।ध्रु।।
देवा, तुझा आणि माझा उपास्य आणि उपासक हा संबंध फ़ार जूना आहे. मात्र संतानी मला तुझ्या स्वादिन करून तो विशेष (अधिक शुद्ध) केला आहे ।।2।।
भगवंता, तुझ्या पायावर मी माझा जीवाभाव अर्पण केला आहे. याची पण तुला लाज कशी नहीं बरे ? ।।3।।
तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी मला तुझ्या हवाली करुण, माझ्या उद्घारांची सारी जबाबदारी तुझ्यावर सोपावली आहे. विठ्ठला, मी तुझे पाय सोडणार नाही ।।4।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा