४६१
सम सपाट वेसनकाट निःसंग जालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥१॥
गाऊं रघुरामा हें चि उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ध्रु.॥
ठाव जाला रिता झाकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥२॥
सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग । भिन्न जालें सुख भाव पालटला रंग ॥३॥
लाज भय झणी नाहीं तजियेलीं दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचीं च कोणी ॥४॥
तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें । जनाप्रचित सवें असों एकपणें ॥५॥
अर्थ :- सर्व प्रकारची व्यसने सोडून देवून, सर्वसंगपरित्याग करून मी नि:संग होऊन सौरी झाले आहे. सर्व देश मीच ब्रह्मरुपाने व्यापून टाकले आहे. मी द्वेताला जवळ येऊ देत नाही. ॥१॥
आता रामाचे नाम गावे, इतकेच कर्तव्य उरले आहे. मला द्रव्याची, गोताचीच काय तर जिवाचीही परवा उरलेली नही ॥ध्रु.॥
हा देह आता रिकामा झाला आहे. आता व्स्राने झाकून काय कारचे आहे ? कोणाची लाज बाळगायची ? जगात देवाशिवाय दुसरे कोण आहे ? ॥२॥
सौर्याची संगत झाली आहे; त्यामुळे जगाशी संमंध उरला नाही. ऐक वेगळेच सुख लाभले आहे. देहाविषयी अहंकार नाहीसा होऊन कृतार्थतेचा रंग चढला आहे ॥३॥
आम्हाला लज्या-भय काही राहिले नाही. कारण आम्ही या दोन्ही गोष्टींचा त्याग केला आहे. आम्ही वेश बदललेला आहे. देहबुद्धी सोडून ब्रह्मबुद्धीचा स्वीकार केला आहे. आम्ही आता कोणाचेच कोणी राहिलो नाही ॥४॥
तुकाराम महाराज म्हणतात, ज्या भगवंताने आम्हाला हा वेश दिला, त्याच्या प्रचीतीने आम्ही जनात असूनही एकाकी असू ॥५॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा